वनविभागाच्या पथकाने केली रेस्क्यू;नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
![](https://www.janmadhyam.com/wp-content/uploads/2023/11/f50a491d-ba50-4e9b-8176-23d46eba7de6-1024x576.jpg)
अमरावती/प्रतिनिधी:-जंगलातील अतिशय घातक प्राण्यांमधून एक असलेला सायल प्राणी २४ नोव्हेंबरला रात्री शहरातील तपोवन परिसरात आढळला. सुदैवाने माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने सायलला रेस्क्यू करून जेरबंद केले. मात्र तरीही तपोवन परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी एक महिन्याअगोदर सदर जातीचा प्राणी दस्तूर नगर परिसरात आढळला होता.ज्याचा अद्यापही सुगावा लागलेला नाही. हे विशेष छत्री तलाव परिसरात होणार्या वन्यकटाईमुळे या वन्यपरिक्षेत्रातील अनेक प्राणी शहराकडे धाव घेत आहेत. काही दिवसांपूर्वी सायल जातीचा प्राणी छत्रीतलाव मार्गावरील दस्तूर नगर परिसरात आढळला होता. मात्र अद्यापही त्या प्राण्याचा सुगावा लागलेला नाही तर तेथून आजपर्यंत सदर परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दोन ते तीन दिवस बिबट्याचा मुक्त संचार करीत असताना नागरिकांनी बघितले आहे.त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,तर आता चक्क सायल प्राणी तपोवन परिसरात आढळला.तपोवन परिसरातील संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या मेन गेटच्या बाजूला एक नवीन बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे टाके बाहेरच आहे. सायल प्राणी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान पाण्याच्या टाकीत पडला ही बाब तेथील चौकीदारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ सदर माहिती वन अधिकार्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठून सायल प्राण्याला जेरबंद केले. तेव्हा कुठे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र अशा घातक प्राण्यांच्या वावरामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर रेस्क्यू आरएफओ वर्षा हरणे यांच्या नेतृत्वात श्याम देशमुख, वनपाल,सुनील टिकले – वनरक्षक,ओंकार भुरे- वनमजुर,वैभव राऊत- मजूर,संदीप चौधरी वाहन चालक यांनी केली. अखेर जंगलात सुरक्षित असलेले प्राणी मानव जातीच्या परिसरांमध्ये कसे काय वावरत आहे व या सर्व बाबींना जबाबदार कोण हा प्रश्न सुद्धा येथे निर्माण होतो आहे.