आ. रोहित पवार यांच्या चौकशीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र विरोध

पक्ष उतरला रस्त्यावर, सूडाच्या कारवाईचा निषेध

अमरावती/ प्रतिनिधी-
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ. रोहित पवार यांच्या ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावती येथील येथील कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन निषेध केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या मांडून मांडून या चौकशीप्रकरणी सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

अमरावती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज निवासी निवेदन देऊन रोहित पवार यांच्या चौकशीचा निषेध करण्यात आला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सरकारमध्ये सामील झाला असला राज्यातील असंख्य कार्यकर्ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत आहेत.रोहित पवार यांनी युवांच्या प्रश्नावर नुकतीच त्यांनी पुणे ते नागपूर अशी तब्बल ८०० कि.मी. हून अधिक लांबीची युवा संघर्ष यात्रा काढून त्याकडे सरकारचे लक्ष वेधलेच पण सोबतच शेतकरी, महिला, कामगार, बेरोजगार यांचे मुद्देही आक्रमकपणे मांडले. युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला तर त्यांचा आक्रमकपणा आणि त्यांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद संपूर्ण राज्याला बघायला मिळाला.

पक्षातील पहिल्या फळीतील अनेक नेते सत्तेत सहभागी झाले असले तरी आमदार रोहित पवार हे न डगमगता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाची भूमिका ठामपणे आणि मुद्देसूदपणे मांडत आहेत. यामुळेच घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लावला आहे.

यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचा बडगा उगारून पाहिला तरी आमदार रोहित पवार यांनी या कारवाईला जुमानले नाही. त्यानंतर युवा संघर्ष यात्रा काढून राज्यभर सरकारविरोधात वातावरणनिर्मिती केली. त्यामुळेच लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या या युवा नेत्याला रोखण्यासाठी सरकारकडून सूडाची कारवाई केली जात असून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे लावल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्याविरोधात कारवाई केली जात असेल आणि त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते धोकादायक आहे.
आज आमदार रोहित पवार यांची चौकशी ज्या राज्य सहकारी बँकेच्या प्रकारणावरून केली जात आहे त्या राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळांची यादी पाहीली तर त्यापैकी अनेकजण आज भाजपमध्ये किंवा अजित पवार गटामध्ये किंवा शिंदे गटामध्ये आहेत. त्यात स्वतः अजित पवार यांच्यासह अमरसिंह पंडीत, सुनील फुंदे, नितीन पाटील, माणिकराव कोकाटे, रामप्रसाद बोर्डीकर, शेखर निकम, विजयसिंह मोहिते पाटील, राजन तेली, दिलीपराव सोपल, आनंदराव अडसूळ, धनंजय दलाल यांचा समावेश आहे. शिवाय या बरखास्त संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल असून यामध्ये रोहित पवार यांचा काहीही संबंध नाही. परंतु या सर्वांभोवती सत्तेचे कवच असल्याने त्यांची कोणतीही चौकशी केली जात नाही परंतु आमदार रोहित पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांची मात्र चौकशी केली जात असून ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’ देण्याचा हा प्रकार आहे. तसेच नाबार्डचा अहवाल आणि उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेनुसार दाखल झालेला गुन्हा हा २०१० चा असून आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने कन्नड येथील साखर कारखाना हा २०१२ साली लिलावामध्ये ५०.२० कोटी इतकी सर्वाधिक बोली लावून खरेदी केलेला आहे. त्यामुळे राज्य बँकेकडून बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणात आमदार रोहित पवार यांचा दुरान्वयेही संबंध नाही. शिवाय २०१९ मध्ये ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात कोणताही बेकायदेशीर व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे हा तपासही बंद करण्यात आला आहे. परंतु केवळ त्रास देण्याच्या हेतूनेच या सरकारकडून आमदार रोहित पवार यांची चौकशी करत असून लोकांचे प्रश्न विचारणाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे या आंदोलकांचे म्हणणे आहे. याविरोधातच हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी आक्रमकपणे सरकारविरोधात घोषणाबाजी निषेध केला. या आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.हेमंत देशमुख यांच्यासह कार्याध्यक्ष राजाभाऊ चींचमलातपुरे,कार्याध्यक्ष सय्यद मन्सूर,महिला शहराध्यक्ष सौ. वर्षाताई भटकर, शहर उपाध्यक्ष विशाल बोरखडे, कृष्णराव चौधरी दिलबर शहा, डॉ. धनंजय तोटे, प्रदेश सरचिटणीस मंगेश भटकर, प्रदेश सचिव रोशन कडू, रायुकॉ शहराध्यक्ष विनेश आडतिया, अरबाज पठाण, नुरसुबा सय्यद मन्सूर,निखिल भोजे, हे आणि असंख्य कार्यकर्ते व सामान्य नागरीक सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सामान्य लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. आमदार रोहितदादा पवार हेही आदरणीय शरद पवार साहेबांसोबत महाराष्ट्र धर्माच्या विचारांसाठी लढत आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावर आकसाने कारवाई केली जात असून ती अन्यायकारक आहे. या कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करतो. सरकारने कितीही त्रास दिला तरी आम्ही त्यांना शरण जाणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत घाबरून भाजपसोबत पळूनही जाणार नाही तर कठोर संघर्ष करू, लढू आणि जिंकू.

प्रा.डॉ.हेमंत देशमुख
शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,अमरावती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top