मृतकात वर्धा जिल्ह्यातील दोन अमरावती जिल्ह्यातील एका महिलेचा समावेश
![](https://www.janmadhyam.com/wp-content/uploads/2023/12/blast.jpg)
नागपूर/वर्धा वृत्तसेवा –
नागपूर अमरावती महामार्गावरील बाजारगाव शिवारातील रविवारी सकाळी ९ च्या सुमारास सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत मोठा स्फोट झाला. त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. यात वर्धा जिल्ह्यातील दोन महिलांचा समावेश आहे. स्फोटातील मृतकांची नावे युवराज किसनाजी चारोडे, बाजारगांव ,ओमेश्वर किसनलल मछिर्के, चाकडोह ,मिता प्रमोद उईके, अंबाडा सोनक काटोल,आरती निळकंठा सहारे, कामठी , श्वेताली दामोदर मारबते, कन्नमवार ग्राम वर्धा, रुमीता विलास उईके, ढगा वर्धा,भाग्यश्री सुधाकर लोणारे, भुज ब्रम्हपुरी ,पुष्पा श्रीरामजी मानापुरे शिराळा, अमरावती, मोसम राजकुमार पटले, पांचगांव भंडारा. अशी आहे.
`स्फोटानंतर एनडीआरएफचे पथक बाजारगावमध्ये दाखल झाले आहे. रासायनिक तज्ज्ञांच्या मदतीनं स्फोटामागील नेमक्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे. ही घटना कशामुळे घडली हे अद्याप अस्पष्ट आहे. संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी झाल्यानंतर नेमके काय झालें ते सांगता येईल, असे सोलर कंपनीचे सरव्यवस्थापक आशिष श्रीवास्तव यांनी सांगितले. पोलिस आणि चौकशी करणार्या अधिकार्यांना कंपनी व्यवस्थापन सहकार्य करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कंपनीतील ज्या भागात ही घटना घडली तेथे अंदाजे ३५ ते ४० कामगार काम करीत होते. शिफ्ट पद्धतीने कंपनीचे कामकाज चालते. मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांपैकी अन्य कुणीही जखमी झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्या कामगारांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. पोलिसांनी सोलर कंपनीचा परिसर सील केला आहे. स्फोट झाला, त्याठिकाणी कुणालाही जाण्यास मनाई करण्यात आली आहे. २०१८ मध्ये कंपनीत स्फोट झाल्यांनतर ग्रामस्थांनी कंपनीच्या परिसरात आंदोलन केले होते.
राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ‘नागपुरातील सौरउद्योगात झालेल्या स्फोटात ६ महिलांसह ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने राज्य सरकार या दुःखद प्रसंगी खंबीरपणे उभे आहे. संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार केली जात आहेत. तीच कंपनी आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक आणि पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्याशी सतत संपर्क सुरु आहे. मृतकाच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखाची मदत देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली असल्याचे सांगितले.
नागपूर अमरावती मार्ग रोखून वाहतूक केली विस्कळीत
अमरावती-नागपूर मार्गावरील सोलर कंपनीतील स्फोटानंतर ग्रामस्थांनी मार्ग रोखून धरला. कंपनीत काम करणार्या श्रमिकांना कामाचं ‘टार्गेट’ देण्यात येते, असा आरोप यावेळी करण्यात आले. कामाच्या तुलनेत मिळणारे वेतनही तुटपुंजे असल्याने अनेक कामगारांच्या नातेवाईकांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे अत्यंत नीकटवर्तीय असलेले सत्यनारायण नुवाल या कंपनीचे संचालक आहेत.